*कोव्हीड 19 चा मृत्युदर १.३ टक्के*.
*पालघर मधील चित्र संपूर्ण महाराष्ट्रात दिसेल*
गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड
पालघर जिल्ह्यात कोव्हीड 19 ने जरी प्रभावीत असला तरीही, मृत्युदर १.३ टक्के इतका आहे ही गोष्ट नक्कीच समाधानकारक असून पालघर जिल्ह्यामधील हे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात दिसेल असा विश्वास गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला. .
covid-19 च्या सद्यस्थिती बाबत आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी कोव्हीड 19 ची सद्यपरिस्थिती, आरोग्य विषयक सुविधा याबद्दल विस्तृत माहिती दिली.जिल्ह्यातील सर्व कोव्हीड रुग्णांपैकी ७ रुग्ण हे ऑक्सिजन वर असून व्हेंटिलेटर लावण्याची एकाही रुग्णाला आजपर्यंत गरज लागली नाही अशी माहिती डॉ आव्हाड यांना दिली असता त्यावर डॉ आव्हाढ यांनी या बाबतीत जिल्हा भाग्यवान असून ही आनंदाची गोष्ट आहे.तसेच जिल्ह्याभरात पालघर व वसई ग्रामीण येथे रुग्णांचे प्रमाण तुलनेने जास्त असून वसई व पालघर मधील औद्योगिक वसाहती, रहदारी या गोष्टी त्यास कारणीभूत असून,पालघर जिल्ह्यातील इतर तालुक्यातील तसेच ग्रामीण भागातील हिरवळ, स्वच्छ हवा, प्रदूषण विरहित हवामान, भरपूर प्रमाणात मिळणारा ऑक्सिजन यामुळे हे प्रमाण कमी असावे असे डॉ आव्हाढ यांनी सांगितले. .
पालघर मध्ये औषधांचा साठा पुरेशा प्रमाणात असून औषधाच्या बाबतीत पालघर स्वयंपूर्ण आहे. नागरिकांनी ताप आणि ऑक्सिजन लेवल वेळोवेळी तपासणे गरजेचे आहे असे सांगून कोव्हीड 19 ची बाधा झालीच तर जनतेने घाबरून न जाता सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे असल्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
यावेळी आमदार सुनील भुसारा, जि.प.उपाध्यक्ष निलेश सांबरे, जि.प. बांधकाम सभापती काशिनाथ चौधरी,वसई -विरार महानगरपालिका आयुक्त गगंगाथरण. डी, उपजिल्हाधिकारी (सा.) किरण महाजन, तहसीलदार उज्वला भगत, प्रकल्प संचालक जि. ग्रा. वि.यं.माणिक दिवे, जिल्हा शल्यचिकित्सक कांचन वानेरे,
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दयानंद सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, यावेळी गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन कुठे ही निधी कमी पडू देणार नाही, जिल्ह्यात व्हेंटिलेटर, ऑक्सिजनची कमतरता नाही तसेच जिल्ह्यामध्ये अद्याप कुठल्याही कोरोना बाधिताला व्हेंटिलेटर ची आवश्यकता लागली नाही, परंतु तशी वेळ आल्यास व्हेंटिलेटर शिवाय कोणी रुग्ण मृत्युमुखी पडेल अशी वेळ येणार नाही, असा विश्वास डॉ आव्हाड यांनी व्यक्त केला. कोव्हीड 19 बाधितांचा मृत्यू दर कमी असुन पालघर जिल्ह्यामधील हे चित्र आशादायी असल्याचे डॉ आव्हाड यांनी सांगितले.