नवी मुंबई महानगरपालिका-
अनंत चतुर्दशीदिनी विसर्जनाचे सुव्यवस्थित नियोजन
31 ऑगस्टपासून अत्यंत उत्साहात संपन्न होत असलेल्या श्रीगणेशोत्सवातील दीड, पाच, गौरीसह सहाव्या व सातव्या दिवसाचे श्रीमूर्ती विसर्जन अत्यंत सुव्यवस्थित रितीने संपन्न झाले असून महापालिका आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली 22 पारंपारिक नैसर्गिक व 134 कृत्रिम विसर्जन स्थळांवर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुयोग्य व्यवस्था करण्यात आली होती. अशाच प्रकारे अनंत चतुर्दशीदिनी सार्वजनिक श्रीगणेशोत्सवातील मोठ्या मुर्तींचे विसर्जन होत असल्याने महापालिका क्षेत्रातील सर्व 156 विसर्जन स्थळांवर अधिक काळजी घेण्यात येत आहे.
सर्व 22 विसर्जन स्थळांवर संबंधित विभाग कार्यालयांच्या माध्यमातून स्वयंसेवक, लाईफगार्ड्स व्यवस्था अधिक कृतिशीलपणे कार्यरत असणार आहे. त्यासोबतच अग्निशमन दलाचे जवान कार्यरत असणार आहेत. पोलीस यंत्रणेचेही विसर्जन स्थळावरील कायदा व सुव्यवस्थेकडे बारकाईने लक्ष असणार आहे. सर्व 22 विसर्जन स्थळांवर नागरिकांच्या सुरक्षा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सी.सी.टी.व्ही. यंत्रणा लावण्यात आली असून याव्दारे गर्दीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे.
श्रीमूर्ती विसर्जनाकरीता सर्व नैसर्गिक विसर्जन स्थळी तराफ्यांची तसेच मोठ्या मूर्ती असतात अशा ठिकाणी फोर्कलिफ्ट / क्रेनची व्यवस्था करण्यात आली होती. विसर्जनस्थळांवर होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन सुरक्षेसाठी बांबुचे बॅरेकेटींग करण्यात आले होते तसेच विद्युत व्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्यासह प्रथमोपचार वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली असून भक्तजनांना व्यवस्थितरित्या श्रीमूर्तींची निरोपाची आरती व पूजा करण्यासाठी रांगेत टेबलची मांडणी करण्यात आली आहे.
विसर्जनस्थळांपैकी ‘तलाव व्हिजन’ अंतर्गत सुशोभित करण्यात आलेल्या १४ मुख्य तलावांमध्ये गॅबियन वॉल निर्धारित क्षेत्रातच भाविकांनी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गौरी व श्रीगणेशमुर्तींचे विसर्जन करून पर्यावरण जपणुकीच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या आवाहनास उत्तम सहकार्य मिळत आहे. संबंधित विभाग कार्यालयांच्या माध्यमातून विसर्जनस्थळांवर सूचना व स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या व्यासपीठामुळे भाविकांची गर्दी मोठी असूनही त्यांना आवश्यक सूचना देणे व गर्दीचे नियोजन करणे शक्य झाले आहे
विसर्जनस्थळांवर नागरिकांमार्फत श्रीमुर्तींसोबत आणले जाणारे पुष्पमाळा, फुले, दुर्वा, शमी यासारखे पुनर्प्रक्रिया करण्यायोगे “ओले निर्माल्य” त्यासाठी स्वतंत्रपणे ठेवलेल्या निर्माल्य कलशातच टाकावे तसेच मुर्तीच्या गळ्यातील कंठी, सजावटीचे सामान, प्लास्टिक अशा “सुके निर्माल्य” स्वतंत्र कलशात टाकावे, कोणत्याही परिस्थितीत या वस्तू पाण्यात टाकू नयेत अशा महानगरपालिकेमार्फत करण्यात येणा-या आवाहनाला भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. निर्माल्याची वाहतुक करण्यासाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था करण्यात आली असून हे निर्माल्य महानगरपालिकेच्या तुर्भे प्रकल्पस्थळी विशेष वाहनाव्दारे वाहून नेले जात आहे व त्याचे पावित्र्य जपत त्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे श्रीमुर्तींसोबत आणली जाणारी फळे व खाद्य वस्तू भाविक स्वतंत्र कॅरेटमध्ये ठेवत असून त्यांचे नंतर गरजू मुलांना व नागरिकांना वितरण करण्यात येत आहे.
वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये श्रीगणेशविसर्जन सोहळा पाहण्यासाठी दरवर्षी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेऊन सुयोग्य व्यवस्था करण्यात आली असून त्याठिकाणी उभारण्यात येणा-या मोठ्या मंचावरून विसर्जनस्थळाकडे प्रस्थान करणा-या श्रीगणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणेच नागरिकांच्या मिळणा-या उत्तम सहयोगामुळे यावर्षीच्या श्रीगणेशोत्सवातील आत्तापर्यंतचे श्रीमूर्ती विसर्जन निर्विघ्नपणे पार पडले असून अनंतचतुर्दशीदिनी मोठ्या प्रमाणात होणा-या विसर्जन सोहळ्याकरिता महानगरपालिका आणि पोलीस विभाग यांचेमार्फत सर्वोतोपरी दक्षता घेण्यात आलेली आहे. तरी नागरिकांनी हा विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.