पनवेलकरांच्या भीषण पाणीटंचाईवर आमदार विक्रांत दादा पाटील यांनी वेधले सरकारचे लक्ष.....!!
विधीमंडळ/अर्थसंकल्पीय अधिवेशन
दिनांक-५ मार्च
महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार विक्रांत दादा पाटील यांनी पनवेल शहरातील भीषण पाणीटंचाईचा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला. पनवेल हे लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून झपाट्याने वाढणारे शहर असून, येथे मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातील विविध भागांतून नागरिक रोजगार व उदरनिर्वाहाच्या निमित्ताने स्थलांतरित होत आहेत.
सध्या पनवेल शहरात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, JNPT प्रकल्प, वसई-विरार कॉरिडॉर यांसारख्या महत्त्वाच्या विकास प्रकल्पांचे काम सुरू आहे. तसेच, अनेक खाजगी कंपन्यांचे उद्योग प्रकल्प येथे उभे राहत आहेत. त्यामुळे पनवेल शहराची लोकसंख्या गेल्या १० वर्षांत तब्बल १९४% वाढली आहे. मात्र, शहराच्या झपाट्याने होणाऱ्या वाढीसोबतच पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर बनली आहे.
पनवेलकरांना आवश्यक तेवढा पाणीपुरवठा नाही!
सध्याच्या घडीला पनवेल शहराला २२० MLD (मिलियन लिटर प्रति दिवस) पाणीपुरवठा होतो, मात्र शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार २५० MLD पाण्याची गरज आहे. यामुळे ३० MLD पाण्याची कमतरता निर्माण झाली आहे, जी भविष्यात गंभीर पाणीटंचाईच्या संकटाला आमंत्रण देऊ शकते.
आमदार विक्रांत दादा पाटील यांनी अधिवेशनात केली ठोस मागणी
शहरातील या पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून हेटवणे आणि मोरबे धरणांतून अनुक्रमे ७७ आणि ४० MLD पाणीपुरवठा होत आहे, तो काही प्रमाणात वाढवला गेला, तर सध्याचा पाणीटंचाईचा प्रश्न सुटू शकतो, असे आमदार विक्रांत दादा पाटील यांनी सभागृहात स्पष्ट केले. तसेच, भविष्यात वाढणाऱ्या पाण्याच्या मागणीचा विचार करून सरकारने योग्य पाणीपुरवठा नियोजन व उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी त्यांनी अधिवेशनात केली.
सरकारचा सकारात्मक प्रतिसाद – लवकरच बैठक आयोजित होणार
यावर उत्तर देताना माननीय जलसंपदा मंत्री श्री. गिरीश महाजन यांनी आश्वासन दिले की, पुढील दोन वर्षांत बालगंगा, कोस्हिर आणि शिलार या धरणांच्या माध्यमातून पनवेल शहराला १००% आवश्यक पाणीपुरवठा करण्यात येईल. तसेच, सध्याच्या ३०% पाणीटंचाईच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी लवकरच उच्चस्तरीय बैठक बोलावली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पनवेल शहराच्या भविष्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून, लवकरच पाणीटंचाईवर ठोस उपाययोजना केल्या जातील, अशी अपेक्षा आहे.
-कार्यालय, आमदार विक्रांत दादा पाटील.